नवी दिल्ली -देशातील करोनाविषयक चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातून शुक्रवार सकाळपासून 24 तासांत देशभरात तब्बल 4 लाख 20 हजार 898 चाचण्या घेण्यात आल्या. एकाच दिवसात होणाऱ्या चाचण्यांचा तो विक्रम ठरला.
देशात जानेवारीमध्ये करोनाविषयक चाचण्या घेणारी केवळ एक प्रयोगशाळा होती. मात्र, करोना संकट घोंगावू लागल्यानंतर सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला. आता देशात 1 हजार 301 प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढली आहे.
मागील आठवडाभरात दरदिवशी सुमारे 3 लाख 50 हजार चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात 1 कोटी 58 लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. देशात सध्या प्रति 10 लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण 11 हजार 485 इतके आहे.
सलग तिसऱ्या दिवशी 45 हजारांहून अधिक बाधितांची भर
देशात एका दिवसात नवे 48 हजार 916 करोनाबाधित आढळले. त्यामुळे देशातील बाधितांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी 45 हजारांहून अधिक संख्येची भर पडली. आणखी 757 बाधित दगावल्याने देशातील करोनाबळींची संख्या 32 हजारांवर गेली आहे. तसे असले तरी देशातील करोना मृत्यूदर घटत आहे. तो दर 2.35 टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे.
देशातील बाधित करोनामुक्त होण्याचे वाढते प्रमाण दिलासा देणारे आहे. देशात सध्या 4 लाख 56 हजार सक्रिय बाधित आहेत. तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या 8 लाख 49 हजारांवर गेली आहे. करोना संसर्ग झालेले देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.54 टक्के इतके आहे.