मुंबई : ठाणे खाडी परिसरात जैवविविधता असल्याने या परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वेटलॅंड प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
ठाणे खाडीच्या 65 चौरस किलोमीटरच्या परिसरात 17 चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था (इकोसिस्टीम) असल्याने या क्षेत्रात इतर नवीन बंधने येणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.
देशात एकूण 46 रामसर क्षेत्र आहेत. राज्यात यापूर्वी लोणार सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन क्षेत्रांना रामसर म्हणून मान्यता मिळाली असून ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल.