सातारा – तालुक्यातील वर्णे, निगडी येथील इच्छुक शेतकऱ्यांच्या पडीक, माळरान जमिनी योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करून नवीन एमआयडीसी सुरु करणे तसेच नवीन उद्योग उभारून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उद्योग विभाग आणि एमआयडीसीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णयही घेण्यात आले.
सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मंत्रालयातील त्यांच्या दालनात उद्योगखात्याचे सचिव, उद्योग विभाग व एमआयडीसीचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी यांच्यासोबत नुकतीच संयुक्त बैठक झाली.
या बैठकीत जिल्ह्यातील उद्योजकांच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांसमोर समस्या व विषय मांडले. यावेळी “मास’अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ आदी उपस्थित होते. सातारा शहर व जिल्ह्यात सुमारे 13 औद्योगिक क्षेत्रे कार्यान्वित आहेत व 8 नवीन सुरू होणारी प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रे आहेत. त्यामुळे सातारा येथे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अभियंता कार्यालय सुरु करण्याचा निर्णय बैठकीत झाला. केंद्र शासनाने जिल्ह्याकरिता 100 बेडचे कर्मचारी राज्य बीमा निगम (इएसआय) हॉस्पिटल मंजूर केले असून त्यासाठी सातारा औद्योगिक क्षेत्रातील शासकीय पाच एकर जागा या हॉस्पिटलकरता देण्यात यावी, असे निर्देश सामंत यांनी दिले. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या.
त्यानुसार बैठकीत अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली. सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये महावितरणचे नवीन उपकेंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून हे उपकेंद्र उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये 60 आर जमीन तातडीने देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एमआयडीसीमधील रस्ते नूतनीकरण कामे पुढील महिन्यामध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योगवाढीस जागा उपलब्ध नाही. त्यामुळे विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे उद्योजकांना बाहेर स्थलांतर करावे लागत आहे. सातारा औद्यो गिक वसाहतलगतच्या निगडी व वर्णे गावांतील अनेक शेतकरी पडीक व डोंगराळ जमीन औद्योगिक विकासाकरिता देण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांची पडीक जमीन योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करून औद्योगिक वसाहतीकरिता विकसित करावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. झालेल्या चर्चेनुसार निगडी व वर्णे गावच्या पडीक जमिनी अधिग्रहण करण्यासाठी महसूल विभाग व एमआयडीसी विभाग यांची संयुक्त मिटिंग संबधित शेतकऱ्यांसोबत आयोजित करून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय झाला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सामंत यांच्याशी सर्व विषयांवर चर्चा केली. बैठकीत झालेले सर्व प्रश्न आणि विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे असा शब्द त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे याना दिला.