चंद्रपूर – काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील धानोरकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘धानोरकर साहेब गेलेत यावर अजून विश्वास बसत नाही,’ असे म्हणत अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले.
यावेळी अजित पवार यांनी बाळू धानोरकर यांच्या प्रेमळ स्वभावाचा किस्सा सांगितला आहे. अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादीचे चंद्रपुरात कार्यालय नाही हे त्यांनी ऐकले होते. माझे स्वत:चे कार्यालय आहे ते तुम्ही वापरावे, मी पवार साहेबांना मानतो. आपण एकत्र काम करायला हवे, असे ते म्हणाले होते. मित्रपक्षाला आपले कार्यालय देणारा दिलदार नेता. धानोरकर यांच्या जाण्यामुळे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. आंदोलन करायचे तेव्हा आपली भूमिका यश येईपर्यंत रेटण्याच्या त्यांचा प्रयत्न असायचा.”
पुढे अजित पवार म्हणाले की, “2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की, ‘तुम्ही काय तयारी केली?’ त्यावर धानोरकर यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रपूरची जागा आपल्याला लढवायची आहे, तयारीला लागा, असे सांगितलो होते. पण युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आली. त्यामुळे संपूर्ण तयारी करूनही मला निवडणूक लढवता येणार नाही. मला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं तिकीट द्या, मी लढायला तयार आहे’, असे धानोरकर यांनी म्हटले. त्यावेळी धानोरकर हे पवार साहेबांशीही बोलले आणि पवार साहेबांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार म्हणून बाळू धानोरकर यांना संधी देण्यात आली.”
चंद्रपूर परिसराचा कायापालट झाला पाहिजे, ही बाळू धानोरकर यांची भूमिका होती. ते एखाद्या कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावाही करायचे.बाळू धानोरकर हा सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता होता. बाळू धानोरकर यांचे निधन दु:खद आहे. ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. बाळू धानोरकर हे तरुण होते. धानोरकर साहेब गेलेत यावर अजून विश्वास बसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले.