सातारा – मंद सुखद गारवा, उत्साहाने भारलेल्या जल्लोषपूर्ण वातावरणात दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचा पाचवा वर्धापनदिन सोहळा तब्बल तीन तास रंगला. हॉटेल राधिका पॅलेसच्या लॉनवर राजकीय, सांस्कृतिक, सहकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक, वाचक, जाहिरातदार, एजंट यांनी प्रभात परिवारावर अखंड शुभेच्छांचा वर्षाव करत आपला ऋणानुबंध वृद्धिंगत केला. यावेळी दै. प्रभातच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या प्रकाशित केलेल्या माहितीपूर्ण विशेषांकावर वाचकांच्या उड्या पडल्या.
दै प्रभातच्या सातारा आवृत्तीच्या पाच वर्षाच्या वाटचालीत कडू गोड आठवणीसह अनेक चढउतार आले. नेहमीच परखड व परिस्थिती सापेक्ष वृत्तांकन आणि समतोल बातमीदारी यामुळे दै. प्रभातच्या सातारा आवृत्तीने सातारकरांचा स्नेह प्राप्त करत त्यांच्या हृदयात स्थान मिळविले. त्यांचेच प्रत्यंतर वर्धापनदिन निमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्यात अनुभविण्यास मिळाले. वर्धापनदिन सोहळ्याची सुरवात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आली. दैनिक प्रभातचे संस्थापक, पत्रमहर्षी वा. रा. कोठारी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.व्यासपीठावर यावेळी दैनिक प्रभातचे जनरल मॅनेजर बी. एल. स्वामी, वित्त व्यवस्थापक रवी इंडी, एच. आर. मॅनेजर प्रवीण थूल, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, सातारा आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक एन. एस. पाटील व निवासी संपादक श्रीकांत कात्रे, दिशा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाटील यांनी प्रास्तविकांसह प्रभात सातारा आवृत्तीच्या वाटचालीचा आढावा घेतला.
त्यानंतर मान्यवर, वाचक, जाहिरातदार एजंट आणि स्नेहीजनांच्या शुभेच्छा सोहळ्याला सुरवात झाली. राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रासह व्यापार व्यावसायिक वैद्यकीय अभियांत्रिकी सामाजिक कार्यकर्ते, प्रसार माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून प्रभात परिवाराला मनापासून शुभेच्छा दिल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा व्यक्त केल्या. तर पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे आमदार जयकुमार गोरे, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील यांनी संदेशाद्वारे प्रभात परिवाराला शुभेच्छा दिल्या. या मान्यवरांनी शुभेच्छा देत विशेषांकाचे कौतुक केले. सुमारे अडीच तास हा स्नेहमेळावा उत्तरोत्तर रंगतच गेला. गेल्या दोन वर्षात करोनाच्या संकटामुळे होऊ शकला नव्हता. सातारकरांनी प्रभात परिवाराला मनापासून स्वीकारल्याचे स्नेहमेळाव्याच्या गर्दीवरून दिसून आले.
जिल्ह्यात प्रभातची ओळख आदशर्वत
दैनिक प्रभातने वस्तुनिष्ठ बातम्यांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दैनिक प्रभात सातारा आवृत्ती आणि सहकाऱ्यांना पाचव्या वर्धापन दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. यापुढेही प्रभातची वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने होत राहो ही मनापासून शुभेच्छा. सातारा जिल्ह्यात प्रभातने निर्माण केलेली ओळख आदर्शवत अशी आहे, असे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी म्हटले आहे.
सातारकरांनी दिल्या प्रभातला डिजिटल शुभेच्छा
दै. प्रभातशी असणारी नाळ आणि दै. प्रभातने गेल्या पाच वर्षांमध्ये केलेली सकारात्मक वाटचाल यामुळे हा पेपर सतत वाचावासा वाटतो. अशा असंख्य प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, दैनिक प्रभात हा वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून उभा राहिला आहे. समाजातल्या घटनांना सकारात्मक दिशा देऊन आणि तळागाळातील लोकांना न्याय देण्याची अथक काम दैनिक प्रभातने केले असून दैनिक प्रभातच्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….