बंगळूरू – जी मुलगी शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करेल तिला 2 लाख रूपये दिले जातील अशी घोषणा धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून कोलार येथे झालेल्या पंचरत्न रॅलीत त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने ही मदत देण्याची घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने व्हावीत व त्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने ही योजना सुरू करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की मुलींना शेतकरी नवरा नको असतो. अशा बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. तसे होऊ नये म्हणून असे लग्न करणाऱ्या मुलींना सरकारनेच दोन लाख रूपये दिले पाहिजेत. आपल्या मुलांच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी या एका कार्यक्रमाचा समावेश केला जाईल.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या राज्यात खरी लढत भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यातच होणार आहे. मात्र जनता दलाला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाजही वर्तवला जातो आहे. तसे झाले आणि अन्य दोन पैकी कोणत्या पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही तर जनता दल किंगमेकरच्या भूमिकेत असेल असे भाकित करण्यात आले आहे.