वाई – येत्या दहा वर्षांच्या काळात गॅस सिलेंडर 120 रुपयांनी मिळेल तर 70 पैसे प्रति किलोमीटरप्रमाणे गाडी धावेल. बायो फ्युएल व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत हा बदल होणे शक्य आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणुकीतून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपच्या “मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत बावधन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आ. मदन भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अमर साबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, जिल्हा प्रभारी अतुल भोसले, जिल्हा सरचिटणीस सचिन घाडगे, वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, श्रीमती विजयाताई भोसले, दीपक ननावरे, सौ. मनीषा घैसास, चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, “”गेल्या 9 वर्षात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विकासाचा झंजावत सुरु केला असून सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. तसेच देशातील महिलांना संसदेत प्रतिनिधित्व करता यावे यासाठी 33 टक्के आरक्षण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे 191 महिलांना खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
तर् 100 महिला आमदार म्हणून निवडून येणार आहेत. जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव उज्वल केले आहेच. परंतु, 14 देशांनी आपला सर्वोच पुरस्कार देऊन मोदींना सन्मानित केले आहे. तसेच 78 टक्के भारतीय पंतप्रधान म्हणून नरेंदा मोदी यांनाच पसंती देत आहेत.” मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी डॉ. सुरभी भोसले, माजी आ. मदन भोसले, दीपक ननावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी बावधनकरांनी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून भला मोठा हार घालून जल्लोष्षात सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर बावधन येथील शिवाजी महाराजच्या प्रतिमेस आ. बावनकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. तसेच सजविलेल्या बैलगाडीतून मान्यवरांची मिरवणूक काढून श्री कालभैरवनाथ दर्शन घेऊन अमृतवाटिकेसाठी तयार करण्यात आलेल्या अमृत कलशात बावधन परिसरातील शूरवीरांच्या घरातून माती एकत्रित केली. नंतर बावधन ग्रामस्थांच्यावतीने चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाई तालुक्यातील जांब गावातील काही ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. दीपक ननावरे यांनी प्रास्ताविक केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. संदीप पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास बावधन व वाई तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, ग्रामस्थ कात्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.