खालापूर, (वार्ताहर) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, टँकर आणि कंटेनर या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघाताचा टँकर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २५) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास बोरघाटात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 25) सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास द्रुतगती मार्गावर मुंबई लेनवर दुध टँकर (GJ-18-BV 5559) चालकाचा ताबा सुटला आणि तो कारवर (MH-14-VQ-072) उलटला. त्यानंतर कंटेनर (MH-46-BB-9309) त्या वाहनांना जाऊन धडकला, त्यानंतर कंटेनर देखील उलटला.
तर सुदैवाने कारमधील संकेत अतुल अग्रवाल (वय 29) आणि प्रतिक अतुल अग्रवाल (वय 34, दोघेही रा. खराडी, पुणे) हे बचावले आहेत. उलटलेल्या कंटेनर मधील चालक रितेश चांगदेव जगदाळे (वय 32, रा. माण, सातारा) हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत. तर या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र त्याची ओळख पटलेली नाही.
अपघाताची माहिती प्राप्त होताच त्या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी, आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, आरटीओ अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, मृत्युंजय देवदूत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदतकार्य केले.
टँकरमधील मृत चालकाचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणण्यात आले आहे. अपघाताच्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली.