पुणे – महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपसोबत जाणार नाहीत. पण, त्यांच्या जनता दल युनायटेड पक्षातील एक गट फुटू शकतो, अशी शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना वर्तवली. पक्ष फोडून सरकार पाडायचे आणि आपले सरकार स्थापन करायचे हा मार्ग भाजपला सापडला आहे, असे टीकाही त्यांनी केली.
राज्यातील राजकीय वातावरण एकतर्फी नसल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होणार नाहीत. दोन्ही निवडणुकीत भाजपला यश मिळेल, अशी राज्यात अशी स्थिती नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) वीस वर्षांपूर्वी केलेला हा प्रयोग फसला होता, असे चव्हाण यांनी नमूद केले.
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून तेथेही महाराष्ट्राच्या धर्तीवर सत्तास्थापनेचा प्रयोग होईल का?, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, दुसऱ्या पक्षाच्या सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांना फोडायचे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची किंवा जुने प्रकरण बाहेर काढायचे, हा सरकार पाडण्याचा आणि आपले सरकार स्थापन करण्याचा मार्ग भाजपला सापडला आहे. इंडिया आघाडी यशस्वी होऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील ६५ टक्के मतांची विभागणी करून सरकार आणण्याचे भाजपचे नियोजन आहे, असे चव्हाण म्हणाले.
जागावाटप वेगाने
महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत विचारले असता, काँग्रेसची आघाडीविषयक समितीची बैठक झाली असून जागावाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. त्यामध्ये प्रत्येक जागेचा विचार केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.