पुणे – राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहेत. याद्वारे राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत.
कौशल्य विकास ग्रामीण भागात केंद्रीत असावा, हे शासनाचे उद्दिष्ट आहे. या कौशल्य विकास केंद्रांमार्फत गावातील नागरिकांना रोजगार कमावण्याची, नवे कौशल्य शिकण्याची समान संधी उपलब्ध होणार आहेत. जेणेकरून रोजगारासाठी गावातून शहराकडे होणारे स्थलांतर कमी होईल. त्याचप्रमाणे आता या वर्षात सुरू होणाऱ्या १०० कौशल्य विकास केंद्रांमुळे महाराष्ट्राची कौशल्य संपन्न पिढी तयार करणे अधिक जलद गतीने होणार आहे.
या केंद्रांद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांचे असेल आणि हे अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य केंद्रांशी सुसंगत असणार आहे. त्यासाठी केंद्र शासनातर्फे निश्चित केलेल्या निकषानुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास विभागाकडून सांगण्यात आले.