संदीप प्रल्हाद जाधव या प्राथमिक मराठी शाळेत शिकविणार्या शिक्षकास सिध्दी मनोहर सावंत या माजी विद्यार्थिनीचा 18 एप्रिल 2024 रोजी फोन आला आणि तिने सांगितले… सर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यामध्ये मुलींमध्ये आठवा क्रमांक पटकावला. वास्तविक सिद्धी 2004 ते 2009 पर्यतची बालवाडी आणि लोकमंगल प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी. 15 वर्षानंतरही सिद्धी ज्या प्राथमिक शाळेत शिकत होती. त्या शाळेतील संदीप जाधव या शिक्षकांची आठवणीने आठवण ठेऊन अत्यानंदाने फोन करून मिळालेले यश सांगते. यातच त्या शिक्षकाला ‘पदमश्री’ पुरस्कार मिळाल्याचा आनंद मिळाला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एमआयडीस. लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये सिद्धीला जे शिक्षण मिळाले. त्या शिक्षणामुळे तिचा पाया भक्कम झाल्याचे ती अभिमानाने सांगते. संदीप जाधव यांना आनंदाची बातमी सांगण्यासाठी याच शाळेमधील तिच्याबरोबर यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये असणार्या प्रसन्न कांबळेंकडून जाधवांचा नंबर मिळविते आणि संपर्क साधते ही गोष्ट त्या शिक्षकाला आनंदाने जगण्याची तसेच शिक्षक म्हणून जास्त कार्य करण्याची उर्जा देते.
समाजामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारा शिक्षक किती महत्वाचा असतो ते अशा उदाहरणावरून दिसून येते. सिध्दी सांगत होती…. माझा लोकमंगल शाळेत असताना नेहमीच अभ्यासासोबत खेळ, विविध कार्यक्रम, डान्स, वक्तृत्व अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग असायचा. यामुळे माझ्यामधला आत्मविश्वास वृद्धींगत होण्यासाठी मदत झाली. तसेच 4थीच्या स्कॉलरशीप सारख्या परीक्षांमध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्यामुळे लहानपणापासूनच अभ्यासाची खूप सवय लागली. याचा फायदा मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करताना झाला. जाधव सर धडा असा शिकवायचे कि, तो न वाचता पण डोक्यात बसायचा.
माझ्या आई वडिलानंतर माझ्या शिक्षणातले पहिले गुरु म्हणजे आदरणीय संदीप जाधव सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती नलवडे. खरी शिक्षणाची सुरुवात या दोघांपासून झाली. मी खूप नशीबवान आहे….. मला तुमच्यासारखे शिक्षक लाभले ज्यांनी मला घडवलं आणि आज मी स्वतःला सिद्ध करू शकले. इमारतीचा पाया जर भक्कम असेल तर ती इमारत मजबूत होते तसंच काहीस माझही आहे. माझ्या व्यक्तिमत्वाचा पाया जिथं घातला गेला त्या शाळेला आणि शिक्षकांना मी कधीच विसरणार नाही. संदीप जाधव सर सांगत होते….इयत्ता चौथीत असताना सर्वांना शिवजयंती कार्यक्रमानिमित्त मनोगत व्यक्त करण्याची सक्ती केली होती. सिध्दी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मनोगत व्यक्त करण्याची टाळाटाळ करत होती. त्यावेळी सिद्धीचा शिवाजी महाराजांचा इतिहास हा विषय चांगला होता परंतु स्वतःच्या सभाधीटपणावर तीचा विश्वास नव्हता. पण तिचे शिवाजी महाराजांवरील भाषण सुंदर झाले आणि तिच्यातला आत्मविश्वास दुणावला.
सिध्दी सावंत या विद्यार्थीनीने प्रयत्नपूर्वक स्वअध्ययनाने मिळविलेले हे यश सर्वांना मार्गदर्शक आहे. या यशामध्ये आई शिल्पा सावंत आणि वडील मनोहर सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे. मनोहर सावंत यांचा छोटासा व्यवसाय आहे. शिल्पा सावंत या सिध्दीच्या आईने सर्वजण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिच्या भविष्याच्या दृष्टीने प्रवेश घ्या सांगत असताना सिध्दीला सर्व शिक्षणासाठी मातृभाषेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण दिले. नंतरच्या काळात सांबरवाडी गाव असलेल्या सावंत कुटुंबियांनी गावाकडे घर बांधल्याने सातारला ये-जा करून सिध्दीने शिक्षण पूर्ण केले. यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये अकरावी, बारावी कॉलेज केल्यानंतर पुन्हा कन्या शाळेमधून पदवीचे शिक्षण घेत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास चालू केला.
आई-वडीलांचे शिक्षण 10 वी पर्यंत झालेले. पण सिध्दीच्या मनात जिद्द निर्माण करण्याचे व पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले. स्वयंअध्ययनासाठी वाय.सी. कॉलेजच्या समोर नाळे अभ्यासिकेमध्ये तिनेे स्वतःला स्वयंकेंद्रीत अभ्यासामध्ये गुंतवून घेतले आणि जिद्दीने यशाला गवसणी घातली. त्यासाठी सकाळी सांबरवाडीहून लवकर येणे आणि अभासिकेत दिवसभर अभ्यास करणे हे तिने कसोशीने पाळले. खासगी कोणताही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्व व जुलै 2022 मध्ये सिद्धीने पदासाठी मुख्य परीक्षा दिली. 2 नोव्हेंबर 2023 तिने शारीरिक चाचणी यशस्वी केली. मार्च 2024 मध्ये मुलाखती झाल्या आणि एप्रिल 2024 मध्ये तिला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. तिने मिळविलेले हे यश प्रेरणादायी आहे.
या यशामध्ये मराठी शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी तिने शिक्षण घेतले त्या शाळांमधील शिक्षकांचाही तिला आत्मविश्वास, प्रेरणा देण्यामध्ये सहभाग आहे. एका बाजूने इंग्रजी माध्यमाच्या शाळा झपाट्याने वाढत असताना मराठी माध्यमाच्या शाळा टिकविणे हे शिक्षक, संस्था आणि समाज यांची मोठी जबाबदारी आहे. सिध्दीसारख्या विद्यार्थिनीच्या यशाच्या यशोगाथा आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या प्रकर्षाने सर्वांच्यासमोर कायम सांगत राहणे हेही महत्वाचे आहे. फक्त पेन-वही, पदवी आणि नोकरी-व्यवसाय म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजेच ‘शिक्षण’ हे सिद्धी सावंत या विद्यार्थिनीच्या आचरणातून दिसते. असे आनंदझर्याचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येण्यासाठी आपणही मन संवेदनशील ठेऊन जागरूकतेने आपला खारीचा वाटा उचलायला हवाच. मराठी माध्यमाच्या शाळेमधून करिअर नक्कीच घडते.