चंदिगड, दि. 5- पाकिस्तान सरकारने करतारपूर साहिब कोरिडोरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शीखांव्यतिरिक्त अन्य समाजाकडे सोपवले आहे. त्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या असल्याची प्रतिक्रिया शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विषय तातडीने पाकिस्तानकडे उपस्थित करावा. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबरोबर चर्चा करून करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या नवीन व्यवस्थापनाला स्थगिती मिळवावी, असेही बादल यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडून या कोरिडोरचे व्यवस्थापन एव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. करतारपूर साहिब कोरिडोरचे व्यवस्थापन बिगर शीख समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती सोपवणे हे मर्यादा भंग करणारे असून त्यामुळे जगभरातील शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही बादल यांनी म्हटले आहे.
हा बदल प्रकल्पाचा आर्थिक परतावा मिळवण्यासाठी आवश्यक होता, असे कारण पाकिस्तान सरकारने दिले आहे. मात्र पाकिस्तान सरकारचे हे समर्थन अकाली दलाने फेटाळले आहे. जेथे श्री गुरु नानक देव यांनी वृक्षारोपण केले होते, ते करतारपूर साहिब गुरुद्वारा आणि त्यालगतची जमीन लाखो लोकांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून आदराचे स्थान आहे. हा प्रकल्प पैसे कमावण्याचा प्रकल्प नाही, हे पाकिस्तान सरकारने ध्यानात घ्यायला हवे, असेही बादल यांनी म्हटले आहे.