पुणे – करोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून धडपड सुरु आहे. आता “स्वाध्याय’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळणार असून त्यांच्यातील जिज्ञासू, चिकित्सक वृत्ती वाढण्यास मदत होणार आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.
शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “स्वाध्याय’ योजना राबविण्यास ऑनलाइनद्वारे शुभारंभ करून सादरीकरण केले. याप्रसंगी शिक्षणमंत्री बोलत होत्या. अधिकारी, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी याचे युट्युबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणही उपलब्ध करून देण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु असून त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य आहे. हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वाध्याय उपक्रमातून विद्यार्थ्याच्या ऑनलाइन शिक्षणाचे मूल्यमापन करता येणार आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.