यंदाच्या हंगामाकडून व्यावसायिकांना मोठी अपेक्षा
पिंपरी – लॉकडाऊनमुळे सात महिने बंद असलेली उसाची गुऱ्हाळे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत दाखल झाली आहेत. गेला हंगाम वाया गेल्याने आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होत असल्याने ऊस उपलब्ध होत असल्याने, यंदाचा हंगाम लाभदायक ठरण्याच्या अपेक्षेने या व्यावसायिकांनी ही गुऱ्हाळे सुरू केली आहेत.
शहरात शंभरपेक्षा अधिक गुऱ्हाळे शहरवासीयांची उसाच्या रसाची तहान भागवत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात 23 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे या उन्हाळ्याच्या काळात होणाऱ्या मोठ्या कमाईवर व्यावसायिकांना पाणी सोडावे लागले. लॉकडाऊनमुळे दुसरा कोणताच रोजगार उपलब्ध नसल्याने या व्यावसायिकांना गावी परतणे भाग पडले.
काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अनलॉक पाच प्रक्रियेत हॉटेल, रेस्टॉरंट व बिअरबार उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असल्याने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे काही गुऱ्हाळ व्यावसायिकांनी पुन्हा गुऱ्हाळे सुरू केली आहेत. गुऱ्हाळांना लागणारी उसाची मोळी दुकानावरच उपलब्ध होत असल्याने गुऱ्हाळे सुरु झाली आहेत. मानवी अथवा प्राण्याच्या माध्यमातून रस काढणारी गुऱ्हाळे रस्त्यांवर दिसू लागली आहेत.
मराठवाड्यातील व्यावसायिक अधिक
गुऱ्हाळ व्यवसायात मराठवाड्यातील नागरिकांची संख्या अधिक आहे. मराठवाड्यातून येऊन त्यांनी शहरात हा व्यवसाय सुरू केला आहे. जवळपास सहा सात महिन्यांनंतर व्यवसाय सुरू होत आहे. त्यातून अधिक लाभ मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.