पाटणा – लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) अध्यक्ष चिराग पासवान सातत्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे चिराग यांनी नितीश यांच्या पक्षाची (जेडीयू) नाराजी ओढवून घेतली आहे. त्यातून लोजपला पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) घेण्याला जेडीयूकडून तीव्र विरोध केला जाणार असल्याचे सूचित होत आहे.
ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोजपने एनडीएपासून फारकत घेतली. नितीश यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत आणि त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून लोजपने ते पाऊल उचलले. त्यानंतर चिराग यांनी नितीश यांच्यावर टीकेची धार वाढवली आहे.
त्याचवेळी चिराग यांच्याकडून निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाण्याचे सूतोवाच केले जात आहे. त्यामुळे लोजप पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होईल, असे अंदाज बांधले जात आहेत.
त्याविषयीचा प्रश्न बिहारचे मंत्री आणि जेडीयूचे प्रदेश कार्याध्यक्ष अशोक चौधरी यांना पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी विचारण्यात आला. नितीश यांच्याविषयी चिराग यांच्याकडून केली जाणारी वक्तव्ये पाहता त्यांचे एनडीएमध्ये पुन्हा स्वागत कसे होईल, असा प्रतिप्रश्न चौधरी यांनी उत्तरादाखल केला.
बिहारमध्ये सरकारविरोधी वातावरण असल्याच्या चर्चांबाबत विचारल्यावर ते उत्तरले, तसे चित्र विरोधकांकडून तयार केले जात आहे. नितीश यांच्या 15 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे काही मतदारांमध्ये काही प्रमाणात प्रतिकूल भावना असू शकते.
तसे असले तरी बिहारची जनता नितीश यांच्या अनुभवालाच पसंती देईल. त्यांची कारकीर्द निष्कलंक आहे. त्यामुळे बिहारच्या राजकीय पटलावर जेडीयूच मोठा घटक ठरेल. एनडीएला दोन-तृतीयांशच्या आसपास बहुमत मिळेल, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला.