हांडेवाडी, उंड्री, पिसोळी येथील सरपंच, उपसरपंचांची मागणी
मंतरवाडी-कोंढवा रस्त्याचे काम वर्षभरापासून बंद
– महादेव जाधव
कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम पाच वर्षांपासून रेंगाळले असून गेल्या वर्षभरापासून तर काम बंदच आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही बांधकाम विभागाला वारंवार सूचना केल्या आहेत. तसेच, सोशल मीडियावरही अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतरही या मार्गाची कोणतीच दुरुस्ती झालेली नाही. याबाबत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या कामासाठी निधीची तरतूदच नसल्याने काम बंद आहे. याबाबत शासनाला कळविण्यात आले आहे. निधी उपलब्ध होताच कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू होईल, असे सांगण्यात येते.
मात्र, अशा कारभारातून निष्पाप नागरिकांचे बळी या रस्त्यावर गेले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर खुनाचे (सदोष मनुष्यवध) गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी येथील सरपंच, माजी सरपंच तसेच पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या ठिकाणी झालेली कामे म्हणजे अभियंत्यांच्या कामाचा नमुना आहे. मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी चौकापासून काही अंतरावर कॉंक्रिटीकरणाचा रस्ता जेथे सुरू होतो तेथे वाहने वर जाण्यासाठी दगडगोटे टाकुन भराव करण्यात आला आहे. याच ठिकाणी दररोज अपघात घडत आहेत.
पुढे सर्वात धोकादायक स्थिती हांडेवाडीच्या तीव्र चढावर असून दोन-दोन फुूट खोल खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील सर्व डांबर उघडले आहे. दगडगोटे सर्वत्र पसरले असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. उंड्री चौक व परिसरात कलोरी सोसायटीसमोर व आंबेकर हॉटेलसमोर रस्ता पूर्णपणे उखडला आहे.
पिसोळी परिसरात धर्मावत पेट्रोलपंपासमोर बांधकाम विभागाने रस्ता खोदून ठेवला आहे, काम मात्र झालेले नाही. हे ठिकाणीही अपघाती स्पॉट झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी आंदोलने केली आहेत. त्यावेळी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याची आश्वासने दिली आहेत. परंतु, रस्त्यावरील धुळी प्रमाणे ही आश्वासनेही उडून गेली आहेत.
हांडेवाडी याठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. धुळीमुळे प्रदूषण होत असून आजूबाजूचे रहिवासी, हॉटेलचालक व इतर व्यावसायिक हैराण झाले आहेत. खड्ड्यामुळे तर अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.
– हिम्मत हांडे, उपसरपंच, औताडे हांडेवाडी
गेल्या वर्षभरात तर या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या भागातील रहिवासी वैतागून घर सोडून अन्यत्र रहायला गेले आहेत. कामगार व नोकरदारांना वाहतूककोंडीमुळे कामाच्या ठिक़ाणी जाणे आणि येणे यातच मोठा वेळ जात आहे.
– सचिन घुले, माजी उपसभापती
उंड्री व पिसोळीच्या नागरिकांनी या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तरी कोणतेही काम तर सुरू झालेले नाही. यावरून सार्वजनिक बांधकाम खात्याला याचे काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येते.
– मच्छिंद्र दगडे, माजी सरपंच -पिसोळी
ठेकेदाराला काम पूर्ण करता येत नव्हते तर काम घ्यायचे कशाला. जागोजागी रस्ता खोदून नागरिकांच्या जीवाशी खेळ कशाला करायचा या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत.
– अशोक न्हावले, माजी उपसरपंच, हांडेवाडी
बांधकाम खात्याने या मार्गाची ज्या-ज्या ठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्या-त्या ठिकाणी किमान डांबरीकरण करुन वाहनचालक व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
– उल्हास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
सार्वजनिक बांधकाम खात्याची काहीच जबाबदारी नाही का? निष्पाप नागरिकांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का? या विभागाच्या हलगर्जीपणामुळे अनेक नागरिकांचे बळी जात आहेत.
– निवृत्ती बांदल, सरपंच, उंड्री