मुंबई: लॉकडाऊन नंतर हळूहळू पूर्वपदावर येणारी मुंबई दैनंदिनी आता आणखी वेगाने करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकारने आता मुंबई लोकलची सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु केली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांनाही लोकलच्या प्रवासाची परवानगी द्यावी म्हणून राज्य सरकारने रेल्वेकडे मागणी केली करण्यात येत आहे. मात्र या मागणीला मध्य रेल्वेकडून उत्तर आले आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत कठिण होणार आहे. त्याशिाय लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनेही राज्य सरकारला पत्रं लिहून काही मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितलं. या पत्रात मध्य रेल्वेने अडचणींचा पाढाच वाचला आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे आव्हानच ठरणार आहे. सर्वांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी प्रवासाची रुपरेखा ठरवावी लागणार असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेत लोकलच्या 1774 फेऱ्या करण्यात येत होत्या. कोरोना काळात आता या फेऱ्या 706 एवढ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनापूर्वी दिवसाला 45 लाख प्रवासी प्रवास करत होते. एका ट्रेनमध्ये एका फेरीत साधारण 2,500 प्रवासी प्रवास करायचे. कोरोना काळात आता 700 प्रवासी प्रवास करत असून दिवसाला रोज 4 ते 5 लाक प्रवासी प्रवास करत असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू केल्यास रेल्वे फ्लॅटफार्मवरील होणारी गर्दी घातक ठरेल, असं रेल्वेने या पत्रात नमूद केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोनापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 35 ते 40 लाख प्रवासी प्रवास करायचे. सर्व लाइनवर एकूण 80 लाख प्रवासी प्रवास करायचे. यातील 50 टक्के प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी दिली तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल का? हा मोठा प्रश्न असल्याचा सवालही या पत्रातून करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी आणि खासगी कार्यालयातील कामाच्या वेळा बदलण्याची सूचनाही रेल्वेने पत्रातून केल्याचं समजतं.