श्रीनगर – चौदा महिन्याच्या कारावासातून नुकत्याच सुटका करण्यात आलेल्या पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपला कलम 370 पुन्हा लागू करावे या मागणीसाठीचा लढा सुरूच राहील असे म्हटले आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी अचानक निर्णय घेऊन जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम 370 रद्द केले होते. हा केंद्र सरकारने काश्मीरवर दिवसा ढवळ्या टाकलेला दरोडा होता असे त्यांनी म्हटले आहे.
आमच्या जो हक्क बेकायदेशीरपणे आमच्याकडून हिराऊन घेतला आहे तो आम्हाला परत मिळावा ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्हाला लढा देण्याशिवाय पर्यायच नाही असे त्यांनी म्हटले आहे. सुटकेनंतर ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश जारी करून त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
हा लढा आता सोपा असणार नाही याची आम्हाला कल्पना आहे, पण आम्ही निर्धाराने त्यासाठी लढत राहणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या विविध भागातील कारागृहात ज्यांना गेले अनेक दिवस बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले आहे त्यांचीही त्वरित सुटका केली जावी असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळावारी रात्री मुक्त करण्यात आले. त्यांच्या स्थानबद्धतेच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे त्याच्या दोन दिवस आधीच त्यांची सुटका करण्यात आली आहे.