मुंबई – भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली असून दोन्ही पक्षांकडून एकमेकांचा ‘बाप’ काढण्यात येतोय. चंद्रकांत पाटील यांनी काल कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका निर्णयावर टीका करताना, ‘यांच्या बापाची पेंड आहे का?’ असा सवाल केला होता. यानंतर पाटलांच्या या टीकेला आज राष्ट्रवादीने त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले.
राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात.’ अशी टीका करत चंद्रकांत पाटील व मोदींना लक्ष्य केलं. शिंदे यांच्या टीकेनंतर आता चंद्रकांत पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांना टॅग करत, “दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, तुम्हीसुद्धा पाहिलंय!” असं प्रतिउत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांचं ट्विट
“आम्ही शेतकरी,कामगार आणि कष्टकरी जनतेला आपले मायबाप मानतो,आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत.शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांसोबत आम्ही सदैव लढा देऊ.दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, तुम्हीसुद्धा पाहिलंय!”
आम्ही शेतकरी,कामगार आणि कष्टकरी जनतेला आपले मायबाप मानतो,आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत.शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांसोबत आम्ही सदैव लढा देऊ.दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, तुम्हीसुद्धा पाहिलंय! @shindespeaks pic.twitter.com/rbCTGLSlbu
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 14, 2020
काय म्हणाले होते शशिकांत शिंदे
“सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपाची? कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्या साठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे.”
चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ वक्तव्य
चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका निर्णयावर टीका करताना, ‘यांच्या बापाची पेंड आहे का?’ असा सवाल केला. चंद्रकांत पाटील यांनी या टीकेतून अप्रत्यक्षरीत्या जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.