चंडीगढ – नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन छेडणाऱ्या पंजाबमधील 30 शेतकरी संघटना मोदी सरकारशी चर्चा करण्यास राजी झाल्या आहेत. त्यानुसार, उद्या (बुधवार) देशाची राजधानी दिल्लीत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा होईल.
याआधी पंजाबमधील शेतकरी संघटनांनी केंद्राकडून मिळालेला चर्चेचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, आता मन बदलून त्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. कुठल्या चर्चेला आमचा नकार असल्याचे चित्र निर्माण होऊ नये यासाठी दिल्लीला जाण्याचे ठरले, असे शेतकरी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले.
शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे पंजाबमधील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्याशिवाय, त्या राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पांसाठीच्या कोळसा पुरवठ्यातही अडथळे येत आहेत.
त्यापार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनांनी चर्चेसाठी पुढे येण्याचा प्रस्ताव मोदी सरकारकडून देण्यात आला आहे.