नवी दिल्ली – बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा गेल्या काही काळात पश्चिम, आणि वायव्येकडे ताशी 17 किलोमीटर वेगाने सरकला असून आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमाराला हा पट्टा विशाखापट्टणमपासून 25 किलोमीटरवर, दक्षिण- नैऋत्येकडे पोचला आहे.
हा पट्टा, आंध्रप्रदेशातील काकिनाडा आणि नरसापूरच्या जवळ आहे. यामुळे बुधवारी बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी (दररोज 20 सेमी पेक्षा अधिक); तसेच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस, आणि कर्नाटकचा किनारी प्रदेश तसेच दक्षिण कर्नाटकचा आतला भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य भागात आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ताशी 55-65किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून पुढे त्यांचा वेग ताशी 75 किमीपर्यंत वाढू शकतो. मात्र त्यानंतरच्या सहा तासांत या वाऱ्याचा वेग कमी होण्याचा अंदाज असून तो ताशी 45-55किमी पर्यंत कमी होऊ शकेल.
त्यापुढच्या सहा तासात, हा वेग ताशी 65किमी पर्यंत वाढेल, आणि दक्षिण ओडिशा, तामिळनाडू तसेच पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर, तसेच आजूबाजूच्या परिसरात या वादळी वाऱ्यांचा प्रभाव जाणवेल त्यानंतर हा वेग कमी होण्याची शक्यता आहे.