पुणे – ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरात डाळींच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर डाळींच्या जादा साठा तसेच कृत्रिम टंचाई करून भाववाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिला.
मागील काही दिवसांपासून शहरामध्ये डाळींच्या किमतीमध्ये किलोमागे 20 ते 35 रुपयांची वाढ होत आहे. तूरडाळ प्रति किलो 130 रुपये, तर उडीदडाळ प्रति किलो 120 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अजून भार आला आहे.
या महिन्यापासून दसरा, दिवाळी या सणांना सुरुवात होत आहे. सणासुदीच्या काळात डाळींना मागणी वाढते. ही गोष्ट लक्षात घेऊन डाळींचा जादा साठा तसेच चढ्या दराने विकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास पुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. त्यानुसार मोरे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
साठ्यावर येणार मर्यादा
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांचा मर्यादेपेक्षा जादा साठा व्यापाऱ्यांनी करू नये, म्हणून शासनाकडून डाळी व इतर पदार्थांचा साठा किती प्रमाणात ठेवायचा याचा आदेश लवकरच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून काढला जाणार आहे.