कामाचे तास वाढले : कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले
पिंपरी – ‘करोना’मुळे कधी घडल्या नव्हत्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यापैकी एवढ्या मोठ्या प्रमाणात “वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना उद्योगनगरीत पहिल्यांदाच सर्व कंपन्या आणि कार्यालयांनी राबविली. सुरुवातीला बहुतेकांना “वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना अनेकांना आवडली होती.
फेशनल्ससाठी ही संकल्पना म्हणजे एक प्रकारचे स्वातंत्र्यच होते. परंतु आता मात्र बहुतेक कर्मचारी “वर्क फ्रॉम होम’ला कंटाळले असून कधी एकदा कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु होते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उद्योगनगरी म्हणून नावाजले जाणारे पिंपरी-चिंचवड शहर आयटी हब म्हणून देखील ओळखले जाते. या शहरात आयटी, इन्शुरन्स, फायनान्स यासह इतर बड्या कंपन्यांच्या कार्यालयांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. या कंपन्यांच्या लहान-मोठ्या कार्यालयांमध्ये लाखो कर्मचारी काम करत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या ही आयटी, इन्शुरन्स, फायनान्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची आहे. गेल्या सात महिन्यांपासून यापैकी बहुतेक कर्मचारी हे घरातूनच काम करत आहेत.
मनुष्यबळ घटले, काम वाढले
करोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे सर्वच कंपन्यामध्ये मनुष्यबळ कमी झाले आहे. उपलब्ध मनुष्यबळामध्ये काम करुन घेण्यास व्यवस्थापन आग्रही आहे. तसेच आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने बहुतेक कंपन्यांमध्ये पूर्ण क्षमतेने काम सुरु झाले आहे. याचा परिणाम सध्या घरून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना बारा तासांहून अधिक काळ काम करावे लागत आहे. आयटीयन्स वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असतात. त्यांचे देखील कामाची वेळ एक ते दोन तासाने वाढली आहे.
घरीच आहात ना, मग करा ना काम
कर्मचाऱ्यांवर सातत्याने काम पूर्ण करण्याचा दबाव जाणवत आहे. केवळ कर्मचारीच नव्हे तर वरिष्ठ अधिकारी देखील रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही घरीच आहात ना, मग एवढे काम करा ना… असे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर सुट्टीच्या दिवशी देखील घरीच आहात ना, मग करा ना काम असे सांगितले जात आहे.
वर्किंग वुमनची अवस्था बिकट
शहरात खूप मोठ्या प्रमाणात वर्किंग वुमन आहेत. पूर्वी त्या घरचे काम उरकून ऑफिसला जायच्या आणि ऑफिसवरून आल्यानंतर पुन्हा घरचे काम करायच्या. परंतु आता घरात असूनही सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्यांना लॅपटॉप समोर बसावे लागत आहे. त्यामुळे घरातील काम, मुले आणि कार्यालयीन काम याचा ताळमेळ घालताना त्यांची तारांबळ उडत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या कार्यालयीन फोनमुळे कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडत आहे. परिणामी महिला कर्मचारी कार्यालये पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.