मुंबई – समाजमाध्यमांवर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला मारहाण प्रकरणात तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेला सहा महिने उलटल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार? असा प्रश्न उपस्थित केलाय.
किरीट सोमय्या यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना, “ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचं अपहरण केलं, घरी आणलं आणि मारहाण केली. याप्रकरणी सरकारने सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तत्पूर्वी, एप्रिल महिन्यात घडलेल्या या मारहाण प्रकरणानंतर सोमय्या सदर तरुणाची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना मुलुंड येथील त्यांचं निवासस्थान निलम नगर येथून अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या अनंत करमुसे नामक तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. करमुसे यांनी याविरोधात दिलेल्या तक्रारीमध्ये, आव्हाड यांच्या उपस्थितीत त्यांच्या बंगल्यावर ५ एप्रिल रोजी बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे.