पारनेर -धरणे आंदोलनाच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची धार तीव्र करण्यात येईल. तसेच गावागावांमधे एकाच वेळी रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण खटल्याची जलद सुनावणी व्हावी, त्यासाठी राज्य सरकारने घटनापीठ स्थापन करण्यासाठी मराठा समाजातर्फे आज सकाळी 11 वाजता पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा क्राती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर, तालुका समन्वयक संजय वाघमारे, रा. या. औटी, संभाजी औटी, संजय देशमुख, ऍड. गणेश कावरे, राम गाडेकर, धीरज महांडुळे, दीपक रोहोकले, प्रशांत औटी, अमोल रोकडे, तुषार औटी, किरण तराळ आदी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 12 टक्के जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी वाढवाव्यात.
मराठा आरक्षणास स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती व इतर कोणतीही नोकर भरती करण्यात येऊ नये. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नयेत. केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता वरील मागण्यांबाबत तत्काळ निर्णय घ्यावा.
अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करण्यात येईल. जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.