लखनौ – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. हाथरस प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाच आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, ‘ज्यांना विकास रुचत नाही ते जातीय दंगली भडकवू इच्छितात’ असं म्हणत जोरदार पलटवार केला आहे.
मुख्यमंत्र्यानी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत वक्तव्य करतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी विरोधकांचे कान उपटत, “ज्यांना विकास आवडत नाही ती लोकं देशात व प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छितात. या दंगलीच्या आडून त्यांना विकास थांबवत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाल ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे.” असा संदेश लिहला आहे.
जिन्हें विकास अच्छा नहीं लग रहा है, वह जातीय और सांप्रदायिक दंगा भड़काना चाहते हैं।
इन दंगों की आड़ में उन्हें राजनीतिक रोटियां सेंकने का अवसर मिलेगा,इसलिए वे नित नए षड्यंत्र करते हैं,इन षड्यंत्रों के प्रति पूरी तरह आगाह होते हुए हमें विकास की प्रक्रिया को तेजी से आगे बढ़ाना है। pic.twitter.com/vbo7yUgH7H
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 4, 2020
विविध राजकीय पक्षांमधील नेते मंडळींनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. काल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियंका गांधी हे देखील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोचले होते. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे म्हंटले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला असल्याचे जाहीर केले आहे.