भारत आणि चीनदरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी पाच राफेल लढाऊ विमाने भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सामील झाली आहेत. लवकरच रशियाकडून भारताला एस-400 ही क्षेपणास्त्र प्रणालीही मिळणार आहे. इस्राएलकडून स्पाइक क्षेपणास्त्रांसह अन्य काही अत्याधुनिक क्षेपणास्त्रेही भारत खरेदी करीत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय सैन्यदलांची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे आणि या अत्याधुनिक प्रणालींच्या आणि शस्त्रांच्या मदतीने आपली सैन्यदले शत्रूला धूळ चारण्यात सहजपणे यशस्वी होतील.
तीनही सैन्यदलांची ताकद वाढविण्यासाठी अमेरिका, रशिया, फ्रान्स आदी देशांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी करार होत आहेतच; शिवाय “मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गतही सैन्यदलांना बळकटी देण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक, चीन आणि पाकिस्तानसारखे धूर्त शेजारी असताना त्यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी भारताला आपल्या तीनही सैन्यदलांची ताकद वाढविणे अपरिहार्यच बनले आहे. याच मोहिमेअंतर्गत तीनही सैन्यदलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांनी सुसज्ज करण्याचे नियमित प्रयत्न सुरू आहेत.
हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारताने नुकतीच हनुमानउडी घेतली आहे आणि आता आपल्याकडे कोणत्याही देशाची मदत न घेता हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता विकसित झाली आहे. आगामी पाच वर्षांत भारत स्क्रॅमजेट इंजिनासह हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करू शकेल, अशी आशा आहे. पूर्णतः स्वदेशी बनावटीची ब्राह्मोससारखी खतरनाक क्षेपणास्त्रे ही तर आपल्या सेनेची ताकद आहे. शनिवारी अण्वस्रांचा मारा करण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या “शौर्य’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ओडिशा येथील प्रक्षेपणस्थळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची क्षमता एक हजार किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्याची आहे. तसेच दोनशे किलोची अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
जमिनीवरील लक्ष्याला जमिनीवरून मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. नुकतेच “ब्राह्मोस’ या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी केली आहे. त्याचबरोबर “ध्रुवास्त्र’ या मार्गदर्शित रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) काही दिवसांपूर्वी केली. डोळ्यांची पापणी लवण्यापूर्वीच शत्रूचा रणगाडा उद्ध्वस्त करण्याची विलक्षण क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र पूर्णपणे देशी बनावटीचे आहे. निमिषार्धात लक्ष्यभेद करून रणगाड्यांच्या ठिकऱ्या उडविणारे हे क्षेपणास्त्र ओडिशातील चांदीपूर येथे असलेल्या समेकित परीक्षण केंद्रावरून डागण्यात आले. थेट नेम धरून “ध्रुवास्त्रा’च्या माध्यमातून तीन लक्ष्ये अचूकपणे उडविण्यात आली. तसेच “डायरेक्ट’ आणि “टॉप मोड’ अशा दोन्ही स्थितींमध्ये सर्व चाचण्या यशस्वी झाल्या.
चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. जमिनीवरून लॉंचरमधून डागण्यात आलेल्या ध्रुवास्त्राच्या विविध पैलूंची तपासणी या चाचणीदरम्यान करण्यात आली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कसोटीवर ध्रुवास्त्र यशस्वी ठरले. “फायर अँड फॉरगेट’ प्रणालीवर काम करणारे ध्रुवास्त्र हे क्षेपणास्त्र भारताच्या पूर्वीच्या “नाग हेलिना’ची हेलिकॉप्टर आवृत्ती आहे. यामध्ये अनेक नव्या तंत्रांचा समावेश करून क्षेपणास्त्र आजच्या गरजेप्रमाणे विकसित करण्यात आले आहे.
संरक्षणविषयक तज्ज्ञांच्या मते, डीआरडीओने या क्षेपणास्त्रात एकाहून एक सरस प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ध्रुवास्त्र आकाशातून थेट डागल्यास शत्रूचे खंदक, चिलखती वाहने आणि रणगाडे निमिषार्धात बेचिराख करता येतात. हे क्षेपणास्त्र म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट रणगाडाविरोधी अस्त्रांपैकी एक आहे आणि ते हेलिकॉप्टरवरूनही डागता येते. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, ध्रुवास्त्र ही तिसऱ्या पिढीतील “डागा आणि विसरून जा’ (फायर अँड फॉरगेट) प्रकारातील रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली अत्याधुनिक आणि वजनाने हलक्या असलेल्या हेलिकॉप्टरवर बसविण्यात आली आहे.
हलक्या हेलिकॉप्टरवर प्रस्थापित केल्यामुळे या क्षेपणास्त्राची मारक क्षमता बरीच वाढेल. पूर्णपणे स्वदेशी अशा या क्षेपणास्त्राचे पूर्वीचे नाव “नाग’ असे होते. लष्कराच्या ताफ्यात पूर्वीपासून असलेल्या “नाग’ क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती आहे. त्याचा वापर भारतीय लष्कराच्या पूर्णपणे स्वदेशात निर्मीत केलेल्या ध्रुव हेलिकॉप्टरवरून केला जाणार असल्यामुळे त्याचे नाव “ध्रुवास्त्र’ असे ठेवण्यात आले आहे. शत्रूला धडा शिकविण्यासाठी “ध्रुवास्त्र’ हेलिकॉप्टरवर तैनात केले जाईल. अर्थात, डीआरडीओकडून आतापर्यंत ज्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत, त्या सर्व हेलिकॉप्टरविनाच घेण्यात आल्या आहेत. 500 मीटर ते 7 किलोमीटर यादरम्यान मारकक्षमता असलेले हे अत्यंत शक्तिशाली क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाड्याला दिसताक्षणी उद्ध्वस्त करू शकते. अर्थात, 7 किलोमीटर ही मारकक्षमता फार मोठी मानली जात नाही. परंतु ही क्षमताही हळूहळू वाढविण्यात येईल, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. 230 मीटर प्रतिसेकंद या वेगाने लक्ष्याला निमिषार्धात भिडण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र 1.9 मीटर लांबीचे आणि 0.6 मीटर व्यासाचे असून, त्याचे वजन 45 किलो आहे.
दोन्ही प्रकारे आपल्या लक्ष्यावर आक्रमण करण्याबरोबरच “टॉप ऍटॅक मोड’मध्येही कामगिरी फत्ते करण्याची क्षमता “ध्रुवास्त्र’मध्ये आहे. या क्षेपणास्त्राचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य असे की, दुर्गम भागातसुद्धा शत्रूच्या रणगाड्यांवर ते हल्ला करू शकते. या रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणालीत “नाग’ या तिसऱ्या पिढीतील रणगाडाभेदी क्षेपणास्त्राप्रमाणेच “कॅरिअर व्हेइकल’ आहे. ही रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्याही ऋतूत आणि दिवसाबरोबर रात्रीही पराक्रम गाजविण्यासाठी सज्ज आहे. केवळ पारंपरिक संरक्षण कवच असलेले रणगाडेच नव्हे तर स्फोटकांपासून बचाव करणारी प्रणाली असलेल्या रणगाड्यांनाही हे क्षेपणास्त्र नेस्तनाबूत करू शकते.
डीआरडीओने भारतीय लष्करासाठी “ध्रुवास्त्र’सारखे क्षेपणास्त्र तयार करणे हे केवळ लष्करासाठीच नव्हे तर डीआरडीओसाठीही मोठे यश मानले जात आहे. कारण अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांसाठी अन्य देशांवरील भारताचे अवलंबित्व यामुळे संपुष्टात येणार आहे. शेजारी देशांच्या कुरघोड्या मोडून काढण्यासाठी त्वरित प्रतिसाद देणारी अस्त्रे आपल्या भात्यात असावी लागतात. लढाईत “ध्रुवास्त्र’ हेच काम करणार असल्यामुळे ते “गेमचेंजर’ ठरू शकते.
चीनच्या रणगाड्यांचीही क्षणार्धात धूळधाण करण्यास “ध्रुवास्त्र’ सक्षम आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनने तैनात केलेल्या हलक्या रणगाड्यांचा तर हे क्षेपणास्त्र खेळण्याप्रमाणे क्षणार्धात खुर्दा करू शकेल. ध्रुव या स्वदेशी हेलिकॉप्टरवर आरूढ झाल्यानंतर शत्रूच्या रणगाड्यांचा कर्दनकाळ ठरेल आणि जमिनीवरील लढाईची दिशा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे भारताची लष्करी ताकद आता आणखी वाढली आहे.