इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताचे एजंट आहेत. ते देशाबाहेर जाउन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात असा आरोप वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिध्द असलेले पाकिस्तनाचे रेल्वे मंत्री शेख रशिद यांनी केला आहे.
शरीफ यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्या देशाच्या लष्करावर नुकतीच टीका केली आहे. त्यामुळे तेथे वातावरण तापले असतानाच आता रशिद यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर इम्रान यांनीही शरीफ यांना लक्ष्य केले आहे.
शरीफ यांनी पाकिस्तानी लष्करावर टीका करून भारताची बाजू घेतली असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. तर रशिद यांनी त्यांच्या एक पाउल पुढे जात आता शरीफ यांचा उल्लेख थेट भारताचे एजंट असाच केला आहे.
शरीफ यांनी देशात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते देशाबाहेर जाउन भारताच्या पंतप्रधानांशी बोलतात. त्यांची काय चर्चा होते याची पूर्ण माहिती त्यांनी देशासमोर ठेवली पाहिजे.