बटाटा उत्पादक जयसिंग एरंडे यांचा सरकारला सवाल
मंचर (पुणे) – आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा उत्पादकांना भरपाई देण्यासाठी सरकारने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबू नये. मराठावाडा, विदर्भाप्रमाणे सातगाव पठार भागात सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या आहेत का? असा सवाल बटाटा उत्पादक शेतकरी जयसिंग एरंडे यांनी केला.
मंचर प्रांत कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते बटाटा पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या एरंडे बोलत होते. ते म्हणाले, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बटाटा नुकसानीबाबत आवाज उठवून येथील शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे. यावेळी प्रकाश कोळेकर, राहुल बांगर, प्रसाद गावडे, दादाभाऊ पोखरकर, नवनाथ बांगर, वनाजी बांगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पावसाने बटाटा सडल्याने अडचणीत सापडला आहे.
या ठिकाणी सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षाचे नेते तसेच प्रशासनातले अधिकारी येऊन पाहणी करुन गेले आहेत; परंतु अजूनपर्यंत कोणीही ठोस निर्णय घेतलेला नाही. येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरच आपण निर्णय घेणार का. याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, किसानसभेचे नेते डॉ. अमोल वाघमारे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी व सर्व स्थरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातगाव पठार परिसरातील परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ठोस निर्णय शासनाने घेणे अपेक्षित आहे. लवकर निर्णय घेतला नाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सातगाव पठार पाणी योजनेचे अध्यक्ष राम तोडकर आणि युवा शेतकरी अशोक बाजारे यांनी दिला आहे. यावेळी उपस्थितांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचे निवेदन तहसीलदार रमा जोशी यांनी स्विकारले. यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.