जुन्या मालाच्या अत्यंत कमी उपलब्धतेमुळे व्यापारी, शेतीतज्ज्ञांचा अंदाज
रमेश जाधव
रांजणी (पुणे)- चालू वर्षी निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिका यांचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले लागवडीचे क्षेत्र. उन्हाळ कांद्याची वाढलेली आवक नवीन कांद्याच्या उत्पादनाला होणारा उशीर आणि कांद्याचे पावसामुळे झालेले अतोनात नुकसान त्याचबरोबर शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी सावध चाल आणि देशांतर्गत असणाऱ्या मागणीमुळे निर्यात बंदी नंतरही यंदा कांदा भाव खाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
कांदा दर प्रतिकिलोला 50 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यात कांद्याला प्रतिक्विंटल कमाल 4500 रुपये, तर किमान दर दोन हजार रुपये मिळाला. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक ठिकाणी कांद्याची आवक घटल्याचे चित्र आहे.
भविष्यकाळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाजदेखील व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.कांदा निर्यातबंदी अगोदर मुंबई येथील जेएनपीटी येथे पास मिळवून निर्यात प्रक्रिया पूर्ण झालेल्या सुमारे दीडशेच्या जवळपास कंटेनरला निर्यातीची परवानगी मिळाली. तरीदेखील 14 सप्टेंबर रोजी पोहोचलेले शंभरहून अधिक कंटेनर अडकून पडले असल्याचे समजते. त्यामुळे निर्णय घेऊन ते कंटेनर निर्यातीसाठी सोडले जावेत अशी मागणी व्यापारी बांधवांकडून केली जात आहे. अगोदरच कांदा काढणी दरम्यान झालेला पाऊस तापमान व हवामानातील अधिक आर्द्रता यामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे. कांदा अडकून पडल्याने खराब होऊन नुकसान वाढण्याची देखील शक्यता आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यात नवीन कांद्याची आवक होण्यास साधारणतः दोन महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज कांद्याचे प्रमुख अडतदार विलास भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, सध्या शेतकऱ्यांकडे जुना कांदा अत्यल्प शिल्लक आहे. त्यामुळे निर्यातबंदी करूनदेखील दक्षिण भारतातून मागणी असल्याने दहा किलोला 250 ते 300 रुपये दर आहेत. सध्या राज्यात कांदा कमी असल्याने परराज्यातून कांदा आवक करण्याची शक्यता होती; मात्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्येही पावसाने कांदा भिजला आणि नवीन लागवड कमी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याबरोबरच राज्यातही कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.
पणन मंडळाच्या अंदाजानुसार आगामी हंगामातील खरीप कांद्याची आवक पावसामुळे लांबण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ग्राहकांना साठवणुकीतील उन्हाळी कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. आता मात्र साठवणुकीतील कांदा निसर्ग चक्रीवादळात आणि काही शिल्लक कांदा गेल्या महिन्यात विक्री झाल्याने अल्पप्रमाणात कांदा शिल्लक आहे तर काही प्रमाणात कांदा निर्यात देखील झाला आहे. त्यामुळे आता कांदा शिल्लक नसल्याने कांद्याचे दर चढे राहतील.
उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर सड झाली आहे. त्यात खरीप लागवडी खराब होण्याचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळे पुढील चित्र अवघड वाटते म्हणून दरात सुधारणा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. उन्हाळी कांदा दरात सुधारणा असली तरी 70 टक्के कांदा कमी दरात विकला गेला. त्यात उरलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बरोबरी होईल किंवा अधिक मिळेल असे काही चित्र सध्यातरी नाही.
-प्रवीण थोरात, शेतकरी चांडोली बुद्रुक