बॉलीवूडमधील ड्रग्ज सेवनाबाबत अभिनेत्री कंगना राणावतने केलेला दावा अर्धसत्य असल्याचे श्वेता त्रिपाठीने सांगितले आहे. “कार्गो’ आणि “द गोन गेम’सारख्या अलीकडच्या डिजिटल रिलीजमध्ये अभिनयातून प्रभावित झालेल्या “मसान’ फेम अभिनेत्री श्वेता म्हणाली, इंडस्ट्रीमध्ये काम मिळविण्यासाठी कोणाबरोबर झोपावे लागते हा कंगनाला झालेला भ्रम आहे.
श्वेताने एका मुलाखतीत सांगितले की, “मला वाटते की, सध्या इंडस्ट्रीबाबत सुरू असलेल्या चर्चा या निरर्थक आहेत. इंडस्ट्रीबाबत जाणीवपूर्वक वाईट गोष्टी पसरविल्या जात आहे. तसेच येथे कोणीही कोणालाही जबरदस्तीने ड्रग्ज देत नाही. जर कोणाला ड्रग्ज घ्यायचेच असेल तर तो कसेही घेणारच. मग तो मुंबईत असो की देशातील कोणत्याही शहरात राहात असो. याचा मुंबई शहराशी काहीही संबंध नाही.
जेव्हा आपण मुंबईत येतो तेव्हा सुरुवातीच्या काळात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. प्रत्येक नवोदित कलाकारावर मानसिक दबाव हा असतो. अशा काळात कोणी ड्रग्ज सेवन करत असेल, तर तो इंडस्ट्रीचा दोष नाही, असा खुलासा श्वेता त्रिपाठीने केला.
दरम्यान, चित्रपटसृष्टीबाबत जाणीवपूर्वक सुरू असलेल्या नकारात्मक गोष्टींबाबत अनेक महिला कलाकारांनी आवाज उठविला आहे. यात अभिनेत्री जया बच्चन, हेमा मालिनी, विद्या बालन, उर्मिला मातोंडकर, तापसी पन्नू आणि गायिका सोना महापात्रा यांचा समावेश आहे.