नवी दिल्ली – अँटिजेन चाचणी नकारात्मक आली असली तरीही, कोविडसदृश लक्षण असलेल्या रुग्णांची आरटी-पीसीआर स्वॅब चाचणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकाराने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.
‘आरटी-पीसीआर’ चाचणीद्वारे असा पाठपुरावा केला जात नसल्याची बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यावर हे आवाहन करण्यात आले आहे. रॅपिड अँटिजेन निगेटिव्ह आलेल्यांची ‘आरटी-पीसीआर’ चाचणीद्वारे पुन्हा तपासणी करणे अनिवार्य आहे, हे ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे संयुक्तपणे सर्व राज्यांना पत्र लिहून स्पष्टपणे सांगितले आहे.
कोविडची बाधा झालेला कोणीही रुग्ण सुटू नये आणि त्याच्यापासून पुढे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येणार आहे. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी खास नियुक्त अधिकाऱ्याच्या गटामार्फत यंत्रणा उभारण्याची गरजही केंद्राने व्यक्त केली आहे.
हा गट दैनंदिन जलदगती अँटिजेन चाचण्यांच्या अहवालाचे जिल्हा तसेच राज्यस्तरीय विश्लेषण करून नकारात्मक अहवाल असूनही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या पुनर्चाचणीसंबंधी कार्यवाही करेल. देशात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.