मानाच्या आणि प्रमुख गणपतींचे साधेपणाने आज विसर्जन
पुणे – “गणपती बाप्पा मोरया’, “पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मंगळवारी गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात येतो.
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने विसर्जन होणार आहे. दरवर्षी “श्रीं’ना वाजतगाजत निरोप देण्यात येतो. मात्र यंदा मंडळे देखील साधेपणाने निरोप देणार आहेत. परंपरेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ मंगळवारी सकाळी 10.30 वाजता कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करणार आहेत. यानंतर मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन होणार असून, नागरिकांना यंदाचा सोहळा ऑनलाइन पाहता येणार आहे, असे मंडळांच्यावतीने सांगण्यात आले.
1897 साली प्लेगची साथ, महायुद्ध, 1997 सालातील फ्ल्यूची साथ अशी संकटे पुण्यावर आली. मात्र गणेशोत्सवात खंड पडला नाही. 1942 साली कायदेभंग चळवळीमुळे वातावरण अस्थिर होते. त्यावेळी दि.23 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीवर बंदी घातली होती. प्रत्येक गणपती मंडळाने पोलीस सांगतील त्या वाटेने आणि तेवढीच माणसे घेऊन विसर्जन करावे, असे सांगितले होते. त्याकाळी सर्व मंडळांची बैठक झाली. तेव्हा मूर्ती जागेवरच ठेवल्या आणि जागा नसणाऱ्यांनी मूर्ती केसरीवाड्यात ठेवल्या. परवानगी मिळाल्यानंतर, दि.3 नोव्हेंबर रोजी मिरवणुकीस सुरुवात झाली होती. 90 गणपती मंडळे यात सहभागी झाली होती. या दिवशी अश्विन कृष्ण दशमीला विसर्जनाची मिरवणूक निर्विघ्न पार पडली. विसर्जन लांबल्याचे हे एकमेव उदाहरण होते.
– मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक.