सर्वच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना उत्तेजन देण्याची गरज
नवी दिल्ली – चीनबरोबर संघर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारने मोबाइल उत्पादन देशात व्हावे याकरिता 50 हजार कोटी रुपयांची योजना जाहीर केली आहे. मात्र जर सर्वच इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला चालना दिली तर भारत मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकेल, असे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांनी म्हटले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या संघटनेने केंद्र सरकारला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची सध्या निर्यात केवळ 11 अब्ज डॉलर आहे. जर मोबाइल क्षेत्राप्रमाणे इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला चालना दिली तर ही निर्यात 2025 पर्यंत 16 पटींनी वाढून 180 अब्ज डॉलर होईल. सध्या भारत सॉफ्टवेअर निर्यातीत आघाडीवर आहे. जर इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर क्षेत्राला चालना दिली तर हे क्षेत्रही सॉफ्टवेअर क्षेत्राप्रमाणे निर्यात करू शकेल.
केंद्राने मोबाईल उत्पादनाला चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशातील आणि परदेशातील 23 मोबाइल कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत 11 लाख कोटी रुपयाचे मोबाइल फोन देशात निर्माण करण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. जे नियम मोबाइल उत्पादन वाढवण्यासाठी आहेत तेच नियम इतर इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर उत्पादनासाठी लागू केले, तर या क्षेत्राचे उत्पादन तर वाढेल.