स्वयंसेवी संस्था करणार मूर्ती संकलन
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी घाटावर हौदाची सोय केली नाही. दीड दिवसांचे गणपती विसर्जित करण्यात नागरिकांना खूपच अडचणींचा सामना करावा लागला.
भाविकांच्या भावनांशी पालिकेकडून होत असलेल्या खेळामुळे सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले होते. तसेच काही राजकीय पक्षांनीही आंदोलन करत विसर्जन कुठे आणि कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पालिका प्रशासन यावर काहीतरी तोडगा काढेल, असे वाटत होते. परंतु पालिकेने त्यानंतरही विसर्जनासाठी काहीच सुविधा उपलब्ध न करत स्वयंसेवी संस्थांवर जबाबदारी ढकलली आहे.
शहरामध्ये करोनाचे थैमान सुरु आहे. गणेशोत्सवामध्ये त्यामध्ये जास्त वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाने गणेश विसर्जनाला बंधऩे घातली आहेत. मात्र नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन कुठे करायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यासाठी शिवसेनेने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. मात्र त्यानंतरही प्रशासनाने सोय न करता जबाबदारी ढकलली आहे. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार गणेश मूर्तीं विसर्जनासाठी ज्या संस्था दान स्वरूपात घेणार आहेत, त्यांना परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.
सेवाभावी संस्था घरगुती गणपती दान स्वरुपात स्वीकारणार आहेत त्यांना त्यांच्या वाहनांसाठी फक्त पाच व्यक्तिच्या मर्यादेत संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल. ज्या संस्था गणेश विसर्जनासाठी वाहनावर पाण्याची टाकी ठेवणार आहे त्यांनाही परवानगी घ्यावी लागेल. तसेच गरज भासल्यास घरगुती स्वरूपातील गणेशाचे दान व निर्माल्य गोळा करण्यासाठी व्यवस्था क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.मात्र प्रशासन नेमकी काय सोय करणार, हौद उभारणार की फिरते हौद शहरात सुरू करणार याबाबत काहीच उल्लेख केला नाही.
स्वंयसेवी संस्थांनी संकलित केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात येईल. महापालिकेच्या 31 प्रभागांसाठी एक कनिष्ठ अभियंता यांची स्वंयसेवी संस्थेसोबत समन्वयक म्हणून नेमणूक केली असल्याचे आदेशात म्हटले आहे.
कसे होणार विसर्जन?
स्वयंसेवी संस्था एक सामाजिक कार्य म्हणून मूर्ती संकलित करणार आहेत. परंतु त्यांनी सर्व घरातून मूर्ती गोळा कराव्यात, अशी जबरदस्ती त्यांच्यावर कुणीही करु शकणार नाही. शहरात एक लाखाहून अधिक गणेशमूर्ती विराजित करण्यात आलेल्या असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मूर्ती संकलन होणे शक्य आहे का? याचाही पालिकेने विचार केला नाही आणि आपली जबाबदारी स्वयंसेवी संस्थांवर ढकलून दिली. पालिकेने प्रत्येक चौकात, घाटांवर मूर्ती संकलित करून घेण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते. परंतु स्वयंसेवी संस्थांना पुढे करत पालिकेने हात झटकल्याने यंदा विसर्जन कसे होणार असा प्रश्न भाविकांना पडला आहे.