नवी दिल्ली – योग्य ती आरोग्य आचार संहिता सांभाळून फिल्म आणि टेलिव्हिजन निर्मिती करता येईल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली.
गृहमंत्रालय आणि अरोग्य मंत्रालयाशी चर्चा करुन आचारसंहिता बनवण्यात आली आहे. त्यानुसार कॅमेऱ्याकडे तोंड असणाऱ्या कलाकारांना मास्क न घालण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र अन्य सर्व कर्मचाऱ्यांना या आचारसंहितेचे पालन बंधनकारक आहे.
देशात करोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून म्हणजे 25 मार्चपासून दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि चित्रपट निर्मिती पूर्णपणे थांबली आहे. या अवस्थेत 68 दिवस काढल्यानंतर जूनपासून सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली.
याबाबत रविवारी जाहीर केलेल्या आचार संहितेनुसार, हाय रिस्क गटात मोडणाऱ्या व्यक्तींनी जनतेशी येणारा संपर्क टाळावा. मास्कचा वापर सर्वांसाठी बंधनकारक आहे. सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे काटेकोर पालन केले जावे आणि आरोग्य सेतू ऍप वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एडिटींग रुम, सेट, कॅफेटेरीया आदी भागांचे नियमित निर्जंतुकीकरण केले जावे. ग्लोव्हज, बूट, मास्क आणि पिपिई किटचा योग्य वापर केला जावा, असेही आचारसंहितेत स्पष्ट करण्यात आले आहे.