परिवहन महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन; 50 टक्के बससेवा पुर्ववत करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी) – सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाची सार्वजनिक एस.टी. बससेवा 50 टक्के सुरु करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परिवहन महामंडळाच्या सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयासमोर डफ वाजवून आंदोलन करण्यात आले.
युवकचे जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, जिल्हा महासचिव सुनील शिंदे, सुनील गट्टाणी, दिलीप साळवे, विनोद गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार टाळेबंदीत प्रशासनाने राज्य परिवहन विभागाची बससेवा बंद केली. राज्य सरकारने अनलॉकची मोहिम हाती घेतली आहे. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, मॉल आदींना परवानगी देण्यात आली आहे. नागरिक करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी नियमांचे पालन करुन आपले दैनंदिन व्यवहार करत आहे. सध्या आंतरजिल्हा वाहतूक बंदी असली तरी परवानगी घेऊन खासगी वाहनातून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
खासगी वाहनातून प्रवास करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. तसेच ही वाहतूक अपुरी, असुरक्षित व खर्चिक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाची बससेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.