नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षात झालेल्या कथिक कराराची एनआयए मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या याचिकेचा विचार करता येणार नाही असे सरन्यायाधिश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केल्यानंतर याचिकाकर्ते शशांक शेखर झा आणि पत्रकार सॅव्हीओ रॉड्रिग्ज यांनी आपली याचिका मागे घेतली. ते आता उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत.
ही याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्या आधी ती हायकोर्टात करा असे सुप्रिम कोर्टाने त्यांना सुनावले. यात याचिकाकर्त्यांचे म्हणणे असे होते की भारतातील एका राजकीय पक्षाने दुसऱ्या देशाच्या एका राजकीय पक्षाशी करार करण्याने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते. तथापि या मुख्य मुद्द्यालाच सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला भारतातील एक राजकीय पक्ष चीन मधील एका राजकीय पक्षाशी करार कसा करू शकतो असा सवाल त्यांनी केला.
पण असा करार झाला आहे असा आग्रही युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आल्यानंतर तुम्ही तुमच्या म्हणण्या दाखल सर्व माहिती सादर करून दुसरी याचिका सादर करणार असाल तर त्याचा विचार केला जाईल असे कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना बजावले.
जर तुमची माहिती खोटी निघाली तर तुमच्यावरच खटला दाखल केला जाईल असा इशारा कोर्टाने दिल्यानंतर याचिकाकर्त्यांनी आपली याचिका मागे घेतली. भारतातील एक राजकीय पक्ष दुसऱ्या देशाच्या एका राजकीय पक्षाशी करार करू शकतो असा प्रकारच आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकला आहे अशी टिपण्णीही कोर्टाने यावेळी केली.