घरांची मागणी वाढण्यासाठी रोजगार शाश्वतीची गरज
नवी दिल्ली – घरांची मागणी वाढावी यासाठी विकसक शक्य तेवढी दरकपात करीत आहेत. रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करीत आहे. मात्र, एवढ्यामुळे घरांची मागणी वाढणार नाही. त्यासाठी विकासदर वाढून रोजगाराची शाश्वती निर्माण होण्याची गरज आहे, असे रिऍलिटी क्षेत्रातील कन्सल्टंट जेएलएलने म्हटले आहे.
अगोदरच या क्षेत्रात मंदी असताना लॉकडाऊनमुळे प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या परीने या क्षेत्रातील मागणी वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आले आहे. सध्या गुंतवणूक म्हणून घराची खरेदी फारशी होत नाही. ज्यांना घरात राहायला जायचे आहे असे लोक घराच्या खरेदीवर विचार करीत आहेत. पहिले घर खरेदी करणारे अर्थातच भावनिक असतात. ते बऱ्याच गोष्टींचा सारासार विचार करून घर खरेदीचा निर्णय घेतात.
या घर खरेदी करणाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता वाटेल असे वातावरण निर्माण झाल्याशिवाय ते घराचा खरेदीचा विचार करण्याची शक्यता कमी असते. घर खरेदी करणाऱ्यांच्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी जेएलएलने राष्ट्रीय पातळीवर ग्राहकाशी चर्चा करून तयार केलेल्या अहवालातून हे मत पुढे आले आहे.
शहरात घरांचे दर घटणार नाहीत
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घरांचे दर कमी होण्याची गरज काही वेळा व्यक्त केली जाते. मात्र, बहुतांश मोठ्या शहरांमध्ये घरांचे दर सध्या किमान पातळीवर आहेत. कमी नफा घेऊन विकसक घराची विक्री करीत आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात तरी घरांचे दर कमी होण्यास वाव नाही, असे या संस्थेने म्हटले आहे. विकसकांना इन्व्हेंटरी शक्य तितक्या लवकर विकून भांडवल मोकळे करायचे आहे. मात्र, ग्राहक पुढे यायला तयार नाही असे वातावरण आहे.