जयपूर – राजस्थानमधील सत्तासंघर्षाच्या काळात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बळ देणारी घडामोड शनिवारी घडली. त्या राज्यात 2 आमदार असणाऱ्या भारतीय ट्राइबल पार्टीने (बीटीपी) गेहलोत सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.
सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर बीटीपीने सोमवारी दोन्ही आमदारांसाठी पक्षादेश जारी केला. कॉंग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देऊ नये. गेहलोत किंवा बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या पाठीशीही उभे राहू नये. तटस्थ भूमिका घ्यावी, असे त्या पक्षादेशात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, बीटीपीने भूमिका बदलून गेहलोत सरकारला पाठबळ देण्याचे ठरवले आहे.
राजस्थान विधानसभेचे एकूण संख्याबळ 200 आहे. सत्तारूढ कॉंग्रेसचे 107 आमदार आहेत. मात्र, पायलट आणि त्यांचे समर्थक मिळून 19 आमदारांनी सरकारविरोधात बंड पुकारले आहे. त्यानंतरही कॉंग्रेसबरोबरच अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार मिळून 109 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा गेहलोत सरकारकडून करण्यात आला आहे.
पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला पायलट गटाने राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.