90 टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्यांमध्ये यंदा 2,874 विद्यार्थ्यांची वाढ
पुणे – बारावी निकालात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण यंदाही वाढले. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षीच्या 90 टक्क्यांहून अधिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत 2 हजार 874 इतकी वाढल्याचे निकाल आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राज्य शिक्षण मंडळाने 35 टक्क्यांपासून ते 90 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची संख्येची आकडेवारी प्रसिद्ध केले. त्यात यंदा 90 टक्क्यांहून अधिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात 7 हजार 344 एवढी आहे. गतवर्षी ही संख्या 4 हजार 470 इतकी होती. त्यामुळे निकालाबरोबरच विशेष प्राविण्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागणार आहे. एवढेच नव्हे, महाविद्यालयाचा प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता आहे.
यंदापासून गुणपडताळणी ऑनलाइनच
– गुणपडताळणीसाठी अर्जाची मुदत 17 ते 27 जुलै
– पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य
– छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत 17 जुलै ते 5 ऑगस्ट
– छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज
– पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी यंदा ऑनलाइनद्वारे अर्ज
– अर्जासाठी संकेतस्थळ : http://verification.mh-hsc.ac.in
वाणिज्य शाखेचे विद्यार्थी सर्वाधिक
विशेषत: 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य शाखेची सर्वाधिक संख्या आहे. विज्ञान शाखेचे 2 हजार 937 विद्यार्थी, तर कला शाखेचे 377 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 4 हजार 20, तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचे 10 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.
आता पदवी प्रवेशाकडे लक्ष
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील काही दिवसांत महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार. मात्र, करोना संसर्गामुळे यंदा ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागणार आहे. त्यासाठीची व्यवस्था महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयात जावे लागत होते. मात्र, गर्दी टाळण्यासाठी शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. केवळ कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने महाविद्यालयांना करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.