पणजी – राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे गोव्यामध्ये तीन दिवसीय लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती देताना, ‘राज्यभरात या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवशी कडक लॉक डाऊन लागू करण्यात येईल’ असं सांगितलं.
याखेरीज, येत्या १० ऑगस्टपर्यंत राज्यभरामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंद असेल अशी माहितीही सावंत यांनी दिली. अत्यावश्यक सेवांशी निगडित असलेले नागरिक व तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असलेल्या नागरिकांनाच जनता कर्फ्यू व लॉक डाऊन दरम्यान संचार करण्याची मुभा दिली जाणार आहे.
यावेळी बोलताना सावंत यांनी, ‘राज्यातील जनतेकडून मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे याबाबी अपेक्षित असतानाही असे होत नसल्याची खंत व्यक्त केली. आतापर्यंत मास्कचा वापर न केल्याने ४० हजार लोकांकडून दंड वसूलन्यात आला आहे.’ असं सांगितलं.
पावसामुळे रुग्ण वाढण्याची चिंता
मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे १५ ते २० जुलैदरम्यान कोरोना रुग्णांची वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला. यासाठी राज्य सरकारतर्फे प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सुविधा उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी गोव्यात सापडले सर्वाधिक रुग्ण
देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य ठरलेल्या गोव्यामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मंगळवारी राज्यभरात कोरोनाचे १७० नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २७५३ एवढी झाली असून आतापर्यंत १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.