श्रीनगर – काश्मीरातील भारतीय जनता पक्षाचे बंदिपोरा जिल्ह्याचे अध्यक्ष वासिम बारी, त्यांचे वडिल आणि बंधु अशा तीन जणांची दहशतवाद्यांनी नुकतीच हत्या केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
काश्मीरातील भाजप कार्यकर्त्यांना पुरेशी सुरक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. बारी कुटुंबियांच्या पाठीशी देशातील सारा भाजप पक्ष उभा आहे. या हत्येला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही राम माधव यांनी केली.
यावेळी माधव यांच्या समवेत केंद्रीय मंत्री व भाजपचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना हेही उपस्थित होते. बारी कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्याचा प्रकार गेल्या बुधवारी घडला होता. या नंतर प्रशासनाने त्या भागातील 10 विशेष पोलिस अधिकाऱ्यांना (पीएसओ) निलंबीत केले असून एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे.