जयपूर: राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगामुळे कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. यासह राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज रात्री जयपूरमध्ये कॉंग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
गहलोत म्हणाले आहेत की, ‘कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाने एसओजी कडे भाजप नेत्यांकडून होत असलेल्या घोडेबाजाराबद्दल केलेल्या तक्रारीच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचेतक आणि इतर काही मंत्री व आमदारांना विश्वास दाखवण्यासाठी बोलावले आहे.
त्याचबरोबर रविवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी जाहीरपणे सांगितले की राजस्थानमधील परिस्थितीबद्दल पक्ष चिंतेत आहे. मला पक्षाबद्दल चिंता आहे.
राजस्थानमध्ये काही मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली. राज्यामध्ये गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये बेबनाव सुरू असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभुमीवर या सर्वजणांनी गेहलोत यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर पायलट यांचे निकटवर्तीय असलेले कॉंग्रेसमधील काही आमदार दिल्लीला रवाना झाले असल्याचे समजते आहे.
या आमदारांमध्ये राजस्थान कॉंग्रेस अध्यक्षांचाही समावेश आहे. भाजपकडून राजस्थान सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप गेहलोत यांनी केला होता. कॉंग्रेसचे सरकार उलथवण्यासाठी भाजप काही आमदारांना आमिष दाखवत असल्याचे गेहलोत म्हणाले होते.
मात्र भाजपने हा आरोप फेटाळला आहे. मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील सत्तासंघर्ष हा केवळ विकासाच्या मुद्दयामुळेच निर्माण झाला आहे. कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेत्याला पाठवल्यापासूनच ही रस्सीखेच सुरू झाल्यचे भाजपने म्हटले आहे.