जळोची- अखंड मानवजातीला करोना आजाराने धडकी भरवली आहे. शासन प्रशासनाकडून करोनावर मात करण्यासह करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र बारामतीत करोना संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ असल्याचे चित्र दिसून येत आहे.
देशासह राज्यात ठिकठिकाणी करोना सारख्या महामारी चा प्रादुर्भाव वाढत होता. त्यावेळी अवघ्या काही दिवसातच बारामती ‘करोना मुक्त’ झाली होती. मात्र काही बेफिकीर नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे शहरात पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. अशा निष्काळजी व बेफिक्रीमुळे बारामतीत एकाच दिवशी पाच करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत ३६ बारामतीत करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत पैकी २२ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत करोनाने ४ बारामतीकरांचा बळी घेतला आहे.
असे असतानाही शहरात व्यापारी व नागरिकांकडून टाळे बंदीच्या नियमांचे कठोर पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने दुकाने चालू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. पैकी दुकानात सामाजिक अंतर राखले जावे, थर्मल कॅनिंगची मशीन ठेवणे, ग्राहकाची नोंद घेण्यासाठी रजिस्टर ठेवणे या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे.
तसेच गृहपयोगी व शेती उपयोगी वस्तू खरेदीबरोबरच शासकीय कार्यालयात नागरिक निष्काळजीपणे ठिकठिकाणी सामाजिक अंतर न ठेवता गर्दी करताना दिसून येतात. तसेच दारू विक्रीच्या दुकानांमध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना मनाई असतानाही गर्दी होत आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.