मुंबई – राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सातत्याने उफाळून येताना दिसतोय. महविकास आघाडीतील काही नेत्यांनी राज्यपालांच्या कार्यपद्धतीबाबत याआधी देखील उघडपणे नाराजी व्यक्त केली असून शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सामनामधील एका लेखामुळे या वादाच्या चर्चा नव्याने सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांना १२ आमदार व ऑक्टोबरमध्ये सरकार अस्थिर करण्यासंदर्भात लिहिलेल्या लेखावरून प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना राऊत यांनी आपली मतं उघडपणे मांडली.
ते म्हणाले, “१५ जूनला राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची मुदत संपली आहे. घटना देव व धर्मापेक्षा महत्वाची आहे, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. त्या बाळासाहेबांचा मी चेला आहे. मला असं वाटत की हा देश आणि राज्य घटनेनुसार चालावा. घटनेद्वारे जे अधिकार लोकनियुक्त सरकारला देण्यात आले आहेत. घटनेनं जे अधिकार संसदेला आणि दोन्ही सभागृहांना दिले आहेत. त्या अधिकारांचं हनन होऊ नये. ते अधिकार पायदळी तुडवू नये. जी परंपरा आहे, ती पुढे चालू राहावी, त्यासंदर्भात आघाडी सरकार व राज्यपालांमध्ये चर्चा सुरू आहे. मला जे वाटत. जे दिसत ते मी लिहितो. माध्यमांना असं षडयंत्र दिसत असेल तर समोर आणावं.”
यावेळी बदल्यांवरून रंगलेल्या राजकारणाबाबत विचारले असता राऊत यांनी बदल्यांसंदर्भात मुख्यमंत्री अंधारात नव्हते असा निर्वाळा केला. ते म्हणाले, “राज्य चालवताना अनेक प्रसंग येतात. पहिल्यांदाच बदल्यांना स्थगिती दिलेली नाही. काही माध्यमे म्हणतात मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. काही म्हणतात गृहमंत्र्यांनी स्थगिती दिली. कुणी स्थगिती दिली हे आधी ठरवा, मग मी उत्तर देईल.”
सरकार पाच वर्ष टिकणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध असल्याच्या दाव्याला राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं. “महाविकास आघाडीत अंतर्विरोध काय, तर आंतरपाटही नाही. आम्ही वरमाला घातल्या आहेत, आमच्यात कोणताही आंतरपाट नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील तीन प्रमुख पक्षांचं सरकार आहे. ही खिचडी नाही. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. काल शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यांनीही ठाम विश्वास व्यक्त केला आहे की, हे सरकार पाच वर्ष काम करेल.”