पुणे: भाजपनं राजकीय पतंगबाजी करण्याऐवजी जनतेच्या अडचणी आणि समस्या पहाव्यात. भाजपचे नेते पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर का बोलत नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीत समन्वय नसून अंतर्गत वादामुळे हे सरकार पडेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला आज रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.
भाजप नेते राजकीय सोयीचं बोलत असून राजकारण करत आहेत. भाजप लोकांचा विचार करत असेल, तर त्यांनी केंद्र सरकारचा विरोध करावा, असे आवाहन रोहित पवारांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही. त्यांच्या मनात कुठेतरी काही तरी व्हावं हेच आहे. मात्र सरकारमध्ये संवाद आणि चर्चा होत आहे. एक हाती कारभार आमच्यात नाही. आम्ही चर्चा करुन अनुभवाचा फायदा घेऊन लोकहिताचे निर्णय घेतो, असा टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला.