पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर माई ढोरे यांनी केले होते. शहरवासीयांनी हे आवाहन गांभीर्याने घेतलेले रविवारी दिसून आले नाही. शहरात दैनंदिन व्यवहार सुरळीत राहिल्याने तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर आल्याने कर्फ्यूची “ऐशीतैशी’ झाल्याचे पहावयास मिळाले.
शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सरासरी अडीचशे ते तीनशेच्या आसपास रोजची करोनाबाधितांची संख्या आहे.त्यामुळे महापालिका आयुक्तांनी रविवार आणि गुरुवार हे दोन दिवस शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन केले होते. हे आवाहन शनिवारी रात्री आठच्या सुमारास कोणतीही अधिकृत नोटीस न काढता केले होते.
पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर तात्काळ प्रतिसाद मिळतो तसा आपल्याही आवाहनाला प्रतिसाद मिळेल, या अपेक्षेवर असलेल्या आयुक्तांना, महापौरांना शहरवासीयांनी गांभीर्यानेच न घेतल्यामुळे जनता कर्फ्यूचे तीनतेरा वाजले. आठवडाभरापासून सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले होते.
तर सत्ताधाऱ्यांमध्ये लॉकडाऊन की जनता कर्फ्यू याबाबत कोणताच ताळमेळ पहावयास मिळाला नाही. अचानकपणे घेतलेल्या या निर्णयाचे जे व्हायचे तेच झाले. आज (रविवारी) आलेल्या अनुभवातून तरी आयुक्त आणि महापौरांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
गुरुवारच्या कर्फ्यूकडे लक्ष्य
रविवारचा कर्फ्यू अयशस्वी ठरल्यानंतर आता गुरुवारी तरी शहरवासीय कर्फ्यू पाळणार का? याकडे लक्ष्य लागले आहे. सार्वजनिक निर्णय घेताना अनेकांना विश्वासात घ्यावे लागते. मात्र हा निर्णय घेताना कोणालाच विश्वासात घेतले नाही. आता गुरुवारच्या कर्फ्यू संदर्भात तरी इतरांना विश्वासात घेतले जाणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.