नगर -माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे दूरदृष्टी लाभलेले नेते होते. राज्याला त्यांनी प्रगतीच्या वाटेवर घेऊन जात देश पातळीवर भरीव कार्य केले. राज्यात 1972 साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्यात त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली.
अन्नधान्याबाबत त्यांनी राज्य स्वयंपूर्ण करून दाखवले. शेतकऱ्यांना हायब्रीड बियाणे उपलब्ध करून दिले. त्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात धवलक्रांती घडली. कृषी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले.
स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या प्रारंभप्रसंगी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जगताप बोलत होते.
याप्रसंगी कृषी उपसंचालक विलास नलगे, मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी शिल्पा गांगर्डे, तंत्र अधिकारी अश्विनी सपकाळ, प्रभारी सहायक प्रशासनाधिकारी यशवंत पावले, प्रकाश खंडागळे, चंद्रकांत गोरे, माने, प्रवीण गोरे, सरोदे, बोरबने आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कृषी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत पावले यांनी केले, तर आभार अश्विनी सपकाळ यांनी मानले.