पुणे – आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) येथील प्रशिक्षण व सराव केंद्रात ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या तरुणदीप राय, प्रवीण जाधव या तिरंदाजांसह 200 मीटर अंतराच्या शर्यतीतील पॅरालिम्पिकपटू जी. आनंदन यांचा कसून सराव सुरू आहे. करोनाचा धोका कायम असतानाही पाचव्या लॉकडाऊनमध्ये सरकारने दिलेल्या सवलतीमुळे या खेळाडूंना वैयक्तिक सराव करता येत असून आगामी स्पर्धांसाठी हे खेळाडू सज्ज होत आहेत.
तरुणदीप राय व प्रवीण जाधव हे तिरंदाज असून रिकर्व्ह प्रकारात टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरले आहेत. त्यांच्याबरोबरच एएसआयच्या पुणे केंद्रात पॅरालिम्पिकपटू जी. आनंदन हा 200 मीटर अंतराच्या शर्यतीतील धावपटूदेखील सराव करत आहे. पतियाळा, बेंगळुरू, सोनीपत तसेच कर्नाटकमधील बेल्लारी येथील केंद्रात ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या एएसआयच्या खेळाडूंचाही सराव सुरू आहे.
करोनाचा धोका वाढल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने या खेळाडूंना सराव करता येत नव्हता. मात्र, आता सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सराव करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे खेळाडू जवळपास तीन महिन्यांनी सरावाला उतरले आहेत.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढल्यामुळे यंदा जुलैमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी जुलैमध्ये होणार आहे. देशात सरकारने काही सवलती दिल्याने हा सराव सुरू झाला असला तरीही देशातील अनेक खेळाडूंना ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची संधी आगामी काळात होत असलेल्या पात्रता स्पर्धांमधून मिळणार आहे.